रेल्वेमार्गालगत सौर उर्जा निर्मिती उपकरणे बसवण्यात येणार आहेत. तसेच तेजस सारख्या आणखी रेल्वे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक रेल्वे पर्यटन स्थळांना जोडण्यात येणार आहेत. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चेन्नई-बेंगळूरु एक्सप्रेसवे देखील सुरू करण्यात येणार आहे.
खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्वावर 150 रेल्वे सुरू करण्यात येंणार आहेत. याशिवाय खासगी क्षेत्राच्या मदतीने चार रेल्वे स्थानकांचा नव्याने विकास करण्यात येणार आहे. 550 वाय- फाय सुविधादेखील रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येणार आहेत.
खासगी – सार्वजनिक भागीदारीमध्ये “किसान रेल’ सुरू करण्यात येणार आहेत. नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठीच्या या रेल्वेच्या जाळ्यातून अखंड राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी उभी केली जाणार आहे. “पीपीपी’ माध्यमातून उभ्या केल्या जाणाऱ्या या रेल्वेच्या साखळीतून नाशवंत वस्तूंची वेगाने वाहतुक केली जाणे अपेक्षित आहे. तसेच निवडक एक्सप्रेस मार्गांवर रेफ्रेजरेटेड पार्सल व्हॅन आणि नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी भाडेतत्वावर मालवाहतुक रेल्वेचाही प्रस्ताव आहे.
फळे, भाजीपाला, डेअरी उत्पादने, मासे, मांस आदी नाशवंत पदार्थांची अशा शीत व्हॅनमधून वाहतुक केली जाणे अपेक्षित आहे. रेफ्रिजरेटेड पार्सल व्हॅनची घोषणा 2009-10 साली तत्कालिन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे अंदाजपत्रकामध्ये केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.