देशातील वस्तुंचा उत्पादन दर्जा सुधारावा यासाठी प्रत्येक मंत्र्याला क्वालिटी स्टॅंडर्डस जारी केले जाणार आहेत असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दर्जेदार मालांची विक्री वाढेल आणि कमी दर्जाच्या वस्तुंच्या आयातीवरील वायफळ खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे. त्या म्हणाल्या की गेल्या वर्षी सप्टेंबर मध्येच मी सर्व उद्योगांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादनांचा दर्जा वाढवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा अशी सुचना केली होती. क्वालिटी बाबत सर्वच मंत्र्यांना या बाबतीत मार्गदर्शक सुचना जारी केल्या जात आहेत असे त्यांनी नमूद केले.
देशातील पाच हजार वस्तुंसाठी दर्जा हमी साठी तांत्रिक नियंत्रणाचे निकष निश्चीत केले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले. हे निकष निश्चीत करण्याची सुचना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डसला करण्यात आली आहे. भारतात दर वर्षी सुमारे 11 हजार 500 वस्तुंची आयात केली जाते. आयातीवरील या खर्चामुळे व्यापारातील तूट वाढत आहे. या आयातीसाठी विदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे देशांतर्गत वस्तुंच्या उत्पादनात किमान दर्जाचे निकष निश्चीत करून या वस्तुंच्या आयातीवर आपल्याला मर्यादा आणता येणे शक्य आहे असेही त्यांनी नमूद केले.