नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश:धुमाकुळ घातला आहे. त्यातच आता चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. 324 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान चीनमधील वुहान येथून निघाले होते. जे आता दिल्लीत पोहचले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन आत्तापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या गंभीर परिस्थितीतून चीनमधल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवले होते.
Air India special flight carrying 324 Indians that took off from Wuhan (China) lands in Delhi. #Coronavirus
— ANI (@ANI) February 1, 2020
एअर इंडियाने पाठवलेल्या विशेष विमानातून 324 भारतीय दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. ज्यानंतर हे विमान दिल्लीत पोहचले आहे. या नागरिकांना भारतात आणल्यावर तातडीने घरी पाठवण्यात येणार नाही. या सगळ्या रुग्णांसाठी भारतीय लष्कराने हरयाणा येथील मानेसरमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. या ठिकाणी 300 जणांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सगळ्यांना मानेसर येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.
कोरोना व्हायरसचा भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. एका विद्यार्थ्याला या व्हायरसची लागण झाली. हा विद्यार्थी वुहान येथून परतला होता. त्याला आता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर एअर इंडियाने एक विशेष विमान चीनमधील वुहानला पाठवले होते. या विमानातून 324 भारतीय हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत.