नवी दिल्ली : सरकारतर्फे आज एअर इंडियातील कर्जाच्या विळख्याला 100 टक्के समभाग विक्रीला काढण्यासाठी बोली कागदपत्र जारी करण्यात आली. या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी स्वारस्यपत्र मागवण्याकरता 17 मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसमधले सरकारचे समभाग विक्रीला काढण्यात येत आहेत. एअरलाईनचे व्यवस्थापन नियंत्रणही यशस्वी बोलीदाराकडे हस्तांतरित केले जाणार आहे.
एअर इंडिया एक्सप्रेससह एअर इंडिया ही सरकारची एक मोठीच मालमत्ता असून यशस्वी बोलीदाराला एअर इंडिया हा ब्रॅंड वापरण्याचीही परवानगी राहील, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली इथं आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एअर इंडियाची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली असून सरकारकडेही उपाययोजनांचे मर्यादित स्रोत आहेत. सध्या एअर इंडिया कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असून खाजगी एअर क्षेत्र त्यासाठी आवश्यक भांडवल उभे करू शकेल.