मुख्यमंत्र्यांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, पीक विमा योजनेत सुधारणा करणे, पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी केंद्राकडून उर्वरित मिळणारा निधी, मराठी भाषेला अभिजात दर्जा, रेल्वे, परवाडणाछया घरांसाठी मोकळी जागा, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेला निधी… आदी राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची एकजूट दाखवावी.
हे प्रश्न सोडवताना पक्षीय भेदाभेदाला थारा देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस खासदार शरद पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती स्थापन केली.
या समितीच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीसाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन महिन्यात राज्यातील विविध प्रश्नांना न्याय दिला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर अधिवेशन काळात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांची बैठक घेतली.
मराठवाड्यातही अशाच प्रकारे बैठक घेतली. आता उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्वच खासदारांनी आपल्या भागातील विविध प्रलंबित मुद्यांबाबत माहिती देतांना राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर एकत्रित पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. बैठकीस विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
महाराष्ट्राचे कुटुंब म्हणून काम करा!
महाराष्ट्राचं कुटुंब म्हणून खासदारांनी दिल्लीत काम करावं आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. एकजुटीने आवाज उठविला तर प्रश्न सुटतील, असे आवाहन करतानाच जनतेने ज्या कामांसाठी निवडून दिले आहे ते पूर्ण झालेच पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजच्या बैठकीत खासदारांनी जे विविध मुद्दे मांडले आहेत त्यावर राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना यावेळी दिले.
पुढील महिन्यात दिल्लीत बैठक
महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा. त्यात पक्षीय भेदाभेदाला थारा देऊ नका. ज्यावेळी महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असतील त्यावेळी सर्व खासदारांनी आवर्जून उपस्थित राहीले पाहिजे, असे सांगतानाच पुढील महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाहीत याचा आढावा घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.