मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे. केंद्रीय गृहखात्याने याबाबत राज्य सरकारला कळवले आहे. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटीची स्थापना करा अशी विनंती करणारे पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. मात्र त्याआधीच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवले आहे.
मागच्या सरकारचा खोटेपणा बाहेर येऊ नये आणि तो लपवण्यासाठी केंद्र सरकारने तपास स्वत:कडे वळवला आहे. राज्य सरकारने आक्षेप घ्यावा अशी विनंती सरकारला करणार आहे, असा आरोप ऍड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. राज्य सरकारला विश्वासात न घेता एनआयएकडे ही केस का वळवली जात आहे, हे संशयास्पद आहे. लोकशाहीचा अपमान करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. एनआयए जो तपास करणार आहे, तोच तपास एसआयटीने केला असता. तीन वर्षांनंतर केंद्र सरकारला जाग का आहे, असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणात पोलिसांना हाताशी धरुन भाजप सरकारने जाणूनबुजून डाव्यांना टार्गेट केल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून, त्यांनी एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धीजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. तसेच यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.