भारती विद्यापीठ पोलिसांकडून तिघांना अटक
पुणे – रस्त्याने जाताना गाडीची किरकोळ घासाघीस झाल्याने एका तरुणाच्या खुनाचा कट रचण्यात आला. यासाठी तब्बल दोन महिने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो घरी जात असलेल्या रस्त्यावर अपघाताचा बहाणा करत त्याला अडविण्यात आले. यानंतर त्याच्यावर शस्त्राने सपासप वार करण्यात आले. मात्र, आजूबाजूला नागरिक जमा झाल्याने आरोपींनी पळ काढल्याने तरुणाचा जीव वाचला. या गुन्ह्यातील तीघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक गुन्हेगार उत्तमनगर पोलीस ठाण्यातून तडीपार असून त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत.
सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय 24, रा. टिळेकरनगर, कोंढवा), सुनिल उर्फ राठ्या गोपाळ राठोड (वय 23, रा.उत्तमनगर), प्रतिक उर्फ पद्या संजय नलावडे (वय 22,रा.येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील सुनील राठोडला उत्तमनगर पोलिसांनी तडीपार केले असून त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अमित रामदास निंबाळकर (वय 25, रा.हवेली) याने फिर्याद दिली होती.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अमित निंबाळकर व आरोपी सागर माने याची दोन महिन्यापूर्वी दुचाकी एकमेकाला घासल्याने भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन सागर माने याने सुरेश मुस्तारी, सुनील राडोड आणि प्रतिक नलावडे यांना फिर्यादीवर लक्ष ठेऊन जीवे ठार मारण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आरोपी फिर्यादीच्या घरी जाण्या-येण्याच्या मार्गावर मागील काही दिवस लक्ष ठेऊन होते. दरम्यान, त्यांना फिर्यादीचा घरी जाण्याचा मार्ग आणि वेळ निश्चीतपणे कळाली होती. त्यानुसार त्यांनी कात्रज तलाव ते राजस सोसायटी दरम्यान ट्रॅप रचला.
फिर्यादी दुचाकीवरुन येत असतानाच यातील एकाच्या दुचाकीने त्याला धडक देत खाली पाडले. अपघाताचा बनाव करीत इतरही साथीदार त्या ठिकाणी आले. यानंतर आरोपीने फिर्यादीवर कोयता आणि लाकडी दांडक्याने डोक्यात व हातावर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेथे नागरिकांची गर्दी जमू लागल्याने आरोपींनी पळ काढला.