नगर – भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला गंडवल्याने आता भाजपचे बुरे दिन सुरु झालेत,असा टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावत पंतप्रधान खासदार व मुख्यमंत्री आमदार निवडतात.ही महत्वाची पदे जनतेतून निवडली जात नाही तर मग सरंपच व नगराध्यक्षच केवळ जनतेतून का असा सवाल मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, आशुतोष काळे, निलेश लंके आदी उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, नागपूर अधिवेशनात महाविकासआघाडीच्या बैठकीत थेट जनतेतून सरपंच निवडीला आक्षेप नोंदविण्यात आला होता.
थेट सरपंच निवडीमुळे विकासकामांवर परीणाम होतो. सरंपच एका विचारांचा तर सदस्य एका विचारांचे असल्याने विकासाला खिळ बसते. माझ्याकडे अनेक तक्रारी याबाबत आल्या आहेत. भाजप सरकारने ज्यावेळी थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्याला मी विरोध केला होता. येणाऱ्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर केले जाईल. नगर जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्याच्याआधी हा निर्णय होईल.