महापुरुषांशी तुलनेवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर
पिंपरी – “आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घेतले आहे. महापुरुषांचे कार्य थोर आहे त्यांच्याशी कोणत्याही राजकीय व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. मात्र याबाबत संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही, त्यांना अलीकडे स्मृतिभ्रंश झाला आहे. 2012 साली शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांची समाधी रायगडावरील छत्रपतींच्या समाधीसारखी झाली पाहिजे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. ही पण तुलनाच आहे. अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
आकुर्डी येथे भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते.
अलिकडे प्रकाशित झालेल्या “आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ यावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी या पुस्तकावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे या दोन्ही समाधी प्रेरणादायी आहेत. त्यावेळी राऊतांनी या दोन्ही समाधीवरून तुलनाच केली होती. मात्र आम्ही आक्षेप घेतला नाही. अशी तुलना करणे योग्यही नाही. त्यामुळे हे पुस्तक आम्ही मागे घेतले आहे. तसेच उदयनराजे भोसले यांच्या बद्दलच्या वक्तव्याचाही पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, राऊत यांनी वक्तव्य करून राजकारणाची पातळी ओलांडली आहे. त्यांना अलीकडे भ्रम व्हायला लागले आहेत. तुम्ही थेट वंशजापर्यंत कसे पोहचू शकता.
इंदिरा गांधीबद्दलचे वक्तव्य निंदनीय
करीमलाला नावाच्या स्मगलरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी भेटायला जायच्या, असेही वक्तव्य राऊत यांनी केले आहे. एका माजी पंतप्रधानाबद्दल असे बोलणे निंदनीय आहे. त्याबद्दल कॉग्रेसला काहीच वाटत नाही याचे नवल वाटते. हे कॉंग्रेसला पटत असेल तर त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. नागरिकत्व कायद्यावरूनही मुस्लिम समाजाची माथी भडकविण्याचे काम त्यांनी केले आहे हे योग्य नाही.