नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे मत
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होत आहे, असे मत नवे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी दहशतवादी कारवायांचा धोका अद्याप कायम असून, शेकडो दहशतवादी पाकिस्तानकडून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर जनरल नरवणे पुढच्या आठवड्यात सियाचिनला जात आहेत. या पदावर आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बाहेरील दौरा आहे. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया आणि दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारते आहे. त्यामध्ये येत्या काळात आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे. पाकिस्तानमधून 200 -250 दहशतवादी नियंत्रणरेषा ओलांडून काश्मीरमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहेत. रोजच्या रोज घुसखोरीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण लष्कराच्या जवानांकडून हे सर्व प्रयत्न उधळून लावले जाताहेत.
भारताने 2016 मध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये बालाकोट येथे केलेले हवाई हल्ले यामुळे पाकिस्तानला कठोर संदेश पोहोचला आहे. यापुढे दहशतवादी कारवायांविरोधात भारत शांत बसणार नाही, हे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. नियंत्रण रेषेच्या पलीकडे 20 ते 25 दहशतवादी शिबिरे सध्या सुरू आहेत. पण त्यांची संख्या आणि स्थान हे सतत बदलत असते. या सर्व दहशतवादी शिबिरांवर भारताचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लष्कराचा राजकीय वापर केला जात असल्याचा मुद्दा त्यांनी साफपणे फेटाळून लावला.