नगरचं राजकारण एवढं सोपं नाही : पवार नगरचे राजकारण ज्याला जमले त्याला कुठेच अडचण नाही : काकडे
नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीची बैठक आज सकाळी टिळक रोडवरील राज पॅलेस हॉटेलमध्ये अत्यंत खेळीमेळीत पार पडली. यात महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले व उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी राजकीय जुगलबंदी मात्र चांगलीच रंगली!
या बैठकीस कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, कॉंग्रेसचे पक्षनिरीक्षक अरूण मुगदिया, शिवसनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर , घनश्याम शेलार,करण ससाणे, कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे,शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे, क्रांतिकारी पक्षाचे गटनेते सुनील गडाख, आदींसह महाविकास आघाडीच्या चारही पक्षाचे दिग्गज उपस्थित होते.
नगरचे राजकारण एवढं सोपं नाही. मी ते जवळून पाहिले आहे, अशी स्पष्टोक्ती यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देताच हशा पिकला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझी राजकारणात सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे, नगरचे राजकारण सोपे नाही हे मी जवळून पाहिले आहे पण मला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येथील लोकांनी समजून घेतलं, मला स्वीकारलं, हा माझ्यासाठी मोठा अभिमान आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मागे काय झालं याच्या फंदात पडायचे नाही. आगामी काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचे व विकास कामे करायचे यासाठी नियोजन करा असा सल्लाही त्यांनी दिला.
जनतेच्या हिताचे निर्णय आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आपण एकत्रितपणे येऊन विकास कामे करून व आघाडी पाच वर्षे सत्तेमध्ये राहून जनतेचा विकास कामांना कशी गती देता येईल असे नियोजन करावे असे पवार म्हणाले.
पक्ष निरीक्षक अंकुश काकडे म्हणाले की, राज्यामध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न तयार झालेला आहे. त्यातून आपल्याला नगर जिल्हा परिषदांमध्ये हा पॅटर्न राबवयाचा आहे. आजच्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आहे.
इतर पक्षांना या कमिट्या द्यायचे आहेत. या संदर्भामध्ये मुंबईत एकत्रित बैठक होणार असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. मागे काय झाले हे पाहू नका. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच अशी परिस्थिती आहे, काळा तो काळाच राहणार. ज्यांनी आपल्यामध्ये फूट पाडली ते आपल्यासोबत आज नाही असा टोलाही त्यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला. नगरचे राजकारण अजिबात सोपे नाही. ज्याला नगरचे राजकारण जमले तो जगात कुठेही राजकारण करू शकतो.
यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले की, माझ्यावेळी महाविकास आघाडी का नाही ठरली. जिल्हा परिषदमध्ये विकास कामे करायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. मागे काय झाले याचा माझ्याकडे मोठा पुरावा आहे; पण मला त्या फंदात पडायचे नाही असे त्यांनी स्पष्ट करत पहिल्या अध्यक्षा बोलू देत नव्हत्या आता तसे होणार नाही, अशी कोपरखळी विखे यांचे नाव न घेता लगावली.
सत्यजित, दिल्लीला विचारयचं का?
या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा करताना राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी सत्यजित तांबे यांच्याकडे निर्देश करत आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करायला काहीच अडचण नाही. पण तुमचं सारं दिल्लीतून ठरतं.तुम्हाला दिल्लीवरून परवानगी घ्यायची का, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सर्वाधिकार दिले आहेत व त्यांनी प्रताप शेळके यांचे नाव जाहीर केल्याचे सांगितले.