मुंबई – मोठ्या कालावधीनंतर सोमवारी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३६ आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या मंत्रिमंडळातून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना वगळण्यात आले. यातच, संजय राऊत यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी न लावल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, मी कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना जात नाही. म्हणून शपथविधी सोहळ्याला गैरहजर होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याच्या उपस्थितीबाबत विचारले असता संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी अपवाद होता, असे त्यांनी सांगितले.
तसेच विरोधकांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, चहा-पानावर बहिष्कार टाकणं ठीक आहे पण शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची पद्धत चुकीची आहे. विरोधी पक्षाची जनतेशी बांधिलकी आहे. त्यांनी अशाप्रकारे बहिष्काराचं शस्त्र वारंवार उपसू नये अन्यथा ते बोथट होईल. जनतेचा विरोधी पक्षावरील विश्वास उडून जाईल. विरोध पक्ष सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतून बाहेर पडण्यास तयार नसेल तर ही पोकळी दुसऱ्या कोणाला तरी भरुन काढावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.