नगर – राष्ट्रीय नागरीक रजिस्टर (एनआरसी) व राष्ट्रीय नागरीकत्व सुधारणा कायदा (सीएए) विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी (दि.26) रोजी दुपारी दोन वाजता मुस्लिम समाजाचा वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विधेयकाला विरोध म्हणून राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दक्ष झाले असून, मोर्चाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
एनआरसी आणि सीएए विधेयकाला मुस्लिम समाजाकडून विरोध होत असताना हिंदू संघटनाकडून समर्थनात मोर्चे निघत आहे. यामुळे अस्थिरतेची स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी दोन वाजता कोठला येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व अंझर खान व फिरोज जहागिरदार करणार आहेत.
कोठला येथून निघणारा मोर्चा ईदगाह मैदान- हॉटेल अशोक-जीपीओ चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. तिथे सभेत रुपांतर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मोर्चातील पाच जणांचे शिष्टमंडळ निवेदन दिले देणार आहेत. यानंतर मोर्चाचे विसर्जन होईल. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुरुवारी मोर्चाच्या मार्गाची पाहणी केली. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक अविनाश मोरे, विकास वाघ, एच. पी. मुलाणी आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात इतरत्र ठिकाणी हे मोर्चे निघात आहेत काही ठिकाणी हिसांचार झाला. या पार्श्वभूमीमुळे शहर पोलिसांनी दक्षता घेतली आहे. पोलिसांनी मोर्चासाठी 37 पोलीस अधिकांऱ्यांसह 500 पोलीस कर्मचारी, 200 गृहरक्षक दलाचे जवान, पाच राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतीदल तैनात करण्यात आले आहे. या मोर्चाच्या मार्गावरील 12 इमारती पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले आहे. पोलिसांनी मोर्चाभोवती 15 ते 20 मॅन्युअल कॅमेरे ठेवले आहेत. शहरात मोर्चामुळे 21 फिक्स पॉईंट लावले आहे.