मृत निदर्शकांच्या कुटूंबीयांच्या भेटीसाठी उत्तरप्रदेश दौऱ्यावर
कोलकता : उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर गेलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाला रविवारी लखनौ विमानतळावरच रोखण्यात आले. शिष्टमंडळाला उत्तरप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा तृणमूलकडून करण्यात आला.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी उत्तरप्रदेशात झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण मिळाले. त्यात काही निदर्शक मृत्युमुखी पडले. त्या मृत निदर्शकांच्या कुटूंबीयांची विचारपूस करण्यासाठी पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूलने शिष्टमंडळ पाठवले.
मात्र, त्या शिष्टमंडळातील सदस्यांना लखनौ विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप तृणमूलने केला. त्या शिष्टमंडळाने पुढे जाण्यासाठी रोखण्यात आल्यानंतर विमानतळावरच धरणे धरले. त्या घडामोडीनंतर तृणमूलने केंद्रात आणि उत्तरप्रदेशात सत्तेवर असणाऱ्या भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
सत्य लपवण्याचा प्रयत्न भाजप का करत आहे? लखनौमध्ये जाण्याची परवानगी कुणालाच दिली जात नाही. उत्तरप्रदेशचे रूपांतर पोलिसांच्या राजवटीत करण्याचा आम्ही निषेध करतो, असे तृणमूलने म्हटले.
त्या टीकेवरून पश्चिम बंगाल भाजपने तृणमूलवर पलटवार केला. तृणमूलच्या सरकारलाच बंगालमधील निदर्शनांवेळी कायदा आणि सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपयश आले. इतर राज्यांना धडे देण्याऐवजी तृणमूलने स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळावे, असे प्रदेश भाजपने म्हटले.