पुणे – हंगामाव्यतिरिक्त आता पुणेकरांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मालावीवरून “टॉमी ऍटकीन’ आंबा मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेत दाखल होत आहे. हा आंबा आडतीवर विक्री केला जात नसल्याने या आंब्याचे भावही ठरविले आहेत. प्रति तीन किलोच्या बॉक्सला 1,200 ते 1,500 रुपये भाव आहे.
पुणे बाजार समितीमध्ये तब्बल 800 बॉक्सची आवक होणार आहे. पुण्यातील आंब्याचे प्रसिद्ध व्यापारी नाथसाहेब खैरे यांच्याकडे आणि मुंबई बाजार समितीतील व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे आवक होणार आहे.
याबाबत आंब्याचे व्यापारी नाथसाहेब खैरे म्हणाले, “टॉमी ऍटकीन’ हा आंबा आतून रत्नागिरी हापूस सारखा आहे. या आंब्याची कोय ही अत्यंत लहान असून वजनाला 300 ते 400 ग्रॅम इतका आहे. यापूर्वी हा आंबा मॅक्सिको आणि अमेरिकेतून भारतात दाखल होत होता. मात्र, यंदा प्रथमच मालावीवरून येत आहे. कोकणातील रत्नागिरी हापूसचा हंगाम अवघा काही महिने असतो. त्यानंतर तो आंबा बाजारात उपलब्ध होत नाही. मात्र, चवीला हापूससारखाच असणारा आंबा रत्नागिरी हापूसच्या हंगामा व्यतिरिक्त उपलब्ध होत आहे, अशी अपेक्षा आहे.