नवी दिल्ली – यावर्षी उन्हाचा देशातील विविध राज्यातील आंबा उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. देशभरात यावर्षी आंबा उत्पादनात 14 टक्के वाढ होऊन हे उत्पादन 24 दशलक्ष टणावर जाईल असे भारतीय फलोत्पादन संस्थेचे संचालक टी दामोदरन यांनी म्हटले आहे. (Nationwide mango production to grow by 14 percent to 24 million tonnes this year)
भारतीय हवामान खात्याने एप्रिल- मे दरम्यान काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र याचा भारतातील आंबा उत्पादनावर जास्त परिणाम होणार नाही. या काळात शेतकर्यांनी अधिक सिंचन करून आंबे या कालावधीत कमकुवत होऊन पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. नंतर मात्र परिस्थितीत फार नकारात्मक बदल होणार नाही. या अगोदर साधारणपणे उष्णतेची लाट दोन ते चार दिवस असे. मात्र यावर्षी ती दहा ते वीस दिवसाची असू शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हा प्रकार दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर पश्चिम भारतात जाणवणार आहे, या भागामध्ये आंब्याचे पीक बर्याच प्रमाणात घेतले जाते, मात्र आंबा तयार होण्याची प्रक्रिया बर्याच प्रमाणात पुढे गेली असल्यामुळे आता उष्णतेची लाट आली तरी त्याचा आंब्यावर फार परिणाम होणार नाही असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी देशात 21 दशलक्ष टन आंब्याचे उत्पादन झाले होते. यामध्ये यावर्षी वाढ होऊन ते 24 दशलक्ष टनापर्यंत जाऊ शकते. दक्षिण भारतात एकूण उत्पादनाच्या 50% उत्पादन होते. यावर्षी दक्षिण भारतात जास्त उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षी विषम हवामानामुळे दक्षिण भारतातील उत्पादनावर 15% चा परिणाम झाला होता.
जागतिक आंबा उत्पादनात भारताचा वाटा 42 टक्के इतका आहे. त्यामुळे जगातील अनेक देश आंब्यासाठी भारतावर अवलंबून असतात. शेतकर्यांनी जमिनीतील मातीची आद्रता कायम राखण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा असे सुचविण्यात आले आहे.