नागरिकांचा संताप : महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार
-प्रकाश गायकर
पिंपरी – मुबलक सोयी-सुविधांयुक्त शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख होती. त्यामध्ये रस्ते, पाणी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. मात्र शहराची ही ओळख आता हळूहळू पुसू लागली आहे. मुबलक सोयी-सुविधा तर दूरच परंतु जीवनावश्यक असलेले पाणी देखील या शहरात आता पुरेसे मिळत नाही. दिवसाआड पाणी कपात सुरु करून महिना उलटत आला तरी प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले नाही. दिवसाआड पाणी कपात सुरु असताना जेव्हा पाणी देता ते तरी पुरेसे द्या, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई जाणवते. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टाक्यांमध्ये पोहचत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी साचवता येत नाही. त्यावर महापालिका प्रशासनाने नागरिकांनी भूमिगत टाक्या बांधण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अनेक सोसायट्यांमध्ये टाक्या बांधण्यासाठी जागा नाही. तर अनेक घरे गल्ली बोळामध्ये असल्याने त्यांनाही टाक्या बांधणे शक्य नाही. दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने त्या वेळेत योग्य दाबाने पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र शहरातील अनेक ठिकाणी कोठे कमी तर कोठे जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर महापालिका प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी कपात केली आहे. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कारण ज्या कारणासाठी पाणी कपात केली ते साध्य झाले नाही. अजूनही खूप कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे अनेकवेळा घरातील पिण्याचे पाणी देखील भरून होत नाही. तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने फक्त तळमजल्यावर जे राहतात त्यांनाच पाणी येते. महापालिका प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शहरातील पाणीपुरवठा नियमित करणे आवश्यक आहे.
– राणी शिगोंटे, गृहिणी
दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी मुबलक प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. टॅंकरवाल्यांनी दरवाढ केली आहे. एकदा टॅंकर आणयाचा असेल तर दीड हजार रुपये मोजावे लागतात. आमच्याकडे कॉट बेसिसवर राहण्यासाठी विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना पाणी पुरवण्यासाठी जास्त दाबाने पाणीपुरवठा झाला तरच टाक्या भरता येतात. जास्त दाबाने व जास्त वेळ पाणी पुरवठा झाला पाहिजे.
– शुभांगी अनपट, होस्टेल संचालिका
पाणी बचतीसाठी हा निर्णय घेतला असेल तर स्वागत आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. नागरिकांना एक वेळ पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही. मात्र जलवाहिनी फुटून रोज हजारो लीटर पाणी वाया जाते. अनेक ठिकाणी जलवाहिन्या लीक झालेल्या आहेत. त्यातूून रोज कितीतरी लिटर पाणी वाया जाते. याकडे महापालिका लक्ष देत नाही. पाणी वेळेत व पुरेसे पुरविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाणी समस्येकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
– रमेश डोंगरे, ज्येष्ठ नागरिक.
वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने खूप गैरसोय होते. पाणी सोडण्यासाठी ठराविक वेळ पाळली जात नाही. त्यामुळे कामानिमित्त रोज घराबाहेर जाणाऱ्या महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एक दिवसाआड पाणी येते मात्र ते देखील अस्वच्छ असते. गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. पाऊस भरपूर पडूनही नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. हे शहराला भूषावह नाही. यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी.
– स्वप्नाली शिरसाट,गृहिणी