सातारा, (प्रतिनिधी) – यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेली आहे. अशा काळात उपलब्ध असलेले नदी पात्रातील पाणी तरी स्वच्छ असले पाहिजे ही किमान अपेक्षा असली तरी सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन व निंब परिसरातील कृष्णा नदी पात्रात पाणी असून प्रचंड प्रमाणात जलपर्णी वाढल्याने ते पाणीही वापरता येत नाही. तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधीही वाढली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा ते रहिमतपूर रस्त्यावर असलेल्या चिंचनेर निंब व चिंचणेर वंदन या गावांच्या परिसरात असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात उन्हाळ्यामुळे पोहायला जात असतात. तर अनेक शेतकरी जनावरे धुवण्यासाठी तर महिलाही कपडे धुवण्यासाठी जात असतात. यावर्षी या परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात मोठया प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे. जलपर्णीने पात्राला पांघरुनच घातले असून पाणी गायब झाले आहे.
या जलपर्णीने पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधीही पसरलेली आहे. तर हिरव्यागार जलपर्णीवर अनेक साप बिनदिक्कतपणे फिरत असल्याने महिला देखील आता कपडे धुवण्यास नदीवर जात नाहीत. तर अनेक मुले नदीच्या आजुबाजूने खेळत असतात. या जलपर्णीमुळे त्यांच्या जीवीताला धोका उद्भवू शकतो. आता भर उन्हाळ्यात ही जलपर्णी एवढी वाढली असून पावसाळ्यात नदीच्या कडेने फिरणे अवघड होणार आहे.
या नदी पात्राची स्वच्छता करण्याची गरज आहे. मात्र, गावाला पाणी योजनेतून पाणी पुरवठा होत असल्याने याकडे ग्रामपंचायतीसह सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. ही वाढलेली जलपर्णी धोकादायक ठरु शकतो. यामुळे नदी पात्राची स्वच्छता करण्यासाठी व पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.