माहीजळगाव, (वार्ताहर) – कुकडी कालव्याचे हक्काचे पाणी सीना धरणात सोडून सीनातून आवर्तन सोडावे, अशी मागणी माहिजळगाव परिसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.
माहीजळगाव परिसरात तीव्र पाणीटंचाई असून शेतकऱ्यांच्या विहीर, बोअरवेल जवळजवळ बंद होत आहेत. त्यामुळे परिसरात दुष्काळाचे सावट असून पाण्याची तीव्र टंचाई आहे. तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाई असल्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत सापडले आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असताना सुद्धा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी परिसरात फिरकत नाही. दुष्काळग्रस्त भागासाठी चालू काळात काही उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकऱ्यांचे गोधन व दुधाचा धंदा बंद पडणार आहे.
त्यासाठी कुकडीचे हक्काचे पाणी सीना धरणात सोडावे, सीना धरणातून आवर्तन सोडल्यास मिरजगाव व माहिजळगाव परिसरातील 22 गावातील तीव्र पाणी टंचाई कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. दुष्काळग्रस्त माहीजळगाव परिसरात २२ गावांसाठी कुकडीचे हक्काचे पाणी सीना धरणात सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सीना धरणाचे आवर्तन 22 गावांसाठी सोडल्यास परिसरातील गोधन, पाणीटंचाई व दूध धंदा वाढण्यास मदत होईल, या सर्व बाबींचा विचार करून शासनाने तातडीने कुकडीतून सीना धरणात आवर्तन सोडावे, अशी मागणी केली जात आहे.