सूर्यकांत पाटणकर
प्रकल्पाने पचवलेत मोठे भूकंपाचे धक्के
कोयना धरण परिसरात पाच रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेची धक्के 96 वेळा बसले आहेत. 2012 नंतर पाचपेक्षा जास्त रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात जाणवलेला नाही, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण परिसरात 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 6.7 रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला. या घटनेला आज (बुधवार) 52 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त….
पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरण परिसरात 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी 6.7 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या घटनेला आज 52 वर्षे होत आहेत. 52 वर्षांपूर्वी या भूकंपामुळे पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात अतोनात नुकसान झाले होते. मोठी मनुष्यहानीही झाली होती. नंतरच्या काळात बाधित गावांचे आणि प्रकल्पातील बांधकामांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले.
आज 52 वर्षांनंतर त्याची फलश्रुती काय? प्रकल्पाचे आणि परिसराचं पूर्ण पुनर्वसन झाले का? की हे प्रश्न इतक्या वर्षांनंतरही लोंबकळतच आहेत? 52 वर्षांपूर्वीचा भूकंप कोयना धरण आणि जलाशयामुळे झाला का? हे प्रश्न अजूनही आहेत. कोयनानगर येथे झालेल्या भूकंपानंर तेथील जनतेचे पुनर्वसनाचे प्रश्न अद्यापही जैसे थे आहेत. कोयना भूकंपानंतर पुनर्वसनाचा कायदा करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी होऊनसुद्धा येथील जनतेला न्याय मिळाला नाही, हेच दुर्भाग्य आहे.
कोयना धरणाचा अथांग पसरलेला शिवसागर जलाशय असून या जलाशयामुळे भूकंप होतात का, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. मात्र, कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ गैरसमज असून धरणातील पाण्यामुळे भूकंप होत नाहीत. केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान संस्थेतील काही संशोधकांचेही हेच मत आहे; पण जगातील मोठ्या धरणांपैकी केवळ दोन-तीन टक्के धरणांच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवतात. हे धक्के धरणाच्या अगदी लगतच्या प्रदेशात जाणवतात.
त्यांची क्षमता दोनपासून तीन रिश्टर स्केलपर्यंत मर्यादित असते. 1967 सालच्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या उत्तरेला 13 किलोमीटर आणि पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर होता. म्हणजेच तो धरणाच्या ईशान्येला 13.5 किलोमीटर अंतरावर होता आणि त्याची भूपृष्ठापासूनची खोली 12 किलोमीटर होती. या तुलनेत जलाशयाची खोली आहे, केवळ 80 मीटर. पाण्याच्या दाबाचा परिणाम हा त्याच्या खोलीवर अवलंबून असतो, पसाऱ्यावर नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
1990 नंतर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून नैऋत्येला 29 किलोमीटर अंतरावर वारणा जलाशय परिसरात सरकत गेला. त्याच्या केंद्रबिंदूची खोली भूपृष्ठापासून चार ते आठ किमी राहिली आहे. अर्थातच कोयना जलाशयाच्या केवळ 80 मीटर खोलीमुळे भूकंप होतात, हा गैरसमज आहे. 1967 साली भूकंप झाल्यानंतर लगेच या भूकंपाच्या कारणांचा, त्याच्या परिणामांचा आणि प्रकल्पातील बांधकामाच्या क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी शासनाने जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीनेही धरणाचा आणि भूकंपाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला होता.
13 सप्टेंबर 1967 रोजी कोयना परिसरात पहिला मोठा भूकंप जाणवला. त्याची क्षमता पाच रिश्टर स्केल होती. त्यानंतर कोयना येथे अधिकृत भूकंप नोंदीसाठी मापन यंत्रे बसवली गेली आणि भूकंपाची अचूक माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यायाने भूकंप आणि कोयना हे समीकरणच झाले आहे. मात्र, त्यामुळे कोयना प्रकल्प बदनाम झाला. राज्यात कुठेही भूकंप झाला तरी कोयनेचा उल्लेख होतोच. भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने येथील औद्योगिकीकरणाला खीळ बसली आहे. संपूर्ण राज्य प्रकाशमान करणारा कोयना परिसर मात्र आजही अंधारात आहेत. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन येथील औद्योगिकीकरणाला चालना देणे गरजेचे आहे. या परिसरात “स्मार्ट व्हिलेज’ची संकल्पना राबवल्यास विकास साधला जाईल.
कोयनेच्या परिसरात आजपर्यंत एक लाख 20 हजार 960 भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद आहे. तीन रिश्टर स्केल क्षमतेपेक्षा कमी भूकंपाचे धक्के सर्वत्र बसत असतात आणि त्यामुळे नुकसान होत नाही. तीन-साडेतीन रिश्टर स्केलपेक्षा अधिक क्षमतेचे भूकंपाचे धक्के जाणवतात. 1967 च्या भूकंपानंतर कोयना धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी सूक्ष्म तडे गेले होते. तातडीचे उपाय म्हणून 1969 पर्यंत हे तडे इपॉक्सी रेझिनने भरून काढण्यात आले आणि धरणाचा सांडव्याजवळच्या उंच भागात पोलादाच्या तारा माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत ओवून त्यांना ताण देण्यात आला. या तारा प्रतिबलित करून धरणाचा हा भाग शिवल्यासारखा एकसंध करण्यात आला. यास “प्राथमिक स्थिरीकरण’ असे म्हणतात.
1969 ते 1972 या काळात धरणाच्या सांडवा वगळून अन्य भागाला खालून जोडस्तंभ बांधून हा भागही पूर्णपणे मजबूत करण्यात आला. 1992 च्या किल्लारीच्या भूकंपापर्यंत कोयना धरणाचा सांडवा पुरेसा मजबूत आहे आणि त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही, असे समजण्यात येत होते; पण किल्लारीच्या भूकंपानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या साऱ्याच धरणांचा आढावा शासनाने नेमलेल्या समितीने घेतला. आवश्यक तेथे धरणांच्या मजबुतीकरणाची शिफारस केली. त्यात कोयना धरणाचा समावेश होता.
1996 साली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. टेंभू, ताकारी, म्हैशाळ या योजनांसाठी कोयना जलाशयातून अतिरिक्त 20 अब्ज घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली. या वाढीव मागणीची काही अंशी पूर्तता म्हणून धरणाच्या सांडव्याच्या दारांना पाच फुटी झडपा बसवून पाणीपातळी पाच फुटांनी वाढविणे आणि अतिरिक्त 6.47 अब्ज घनफूट पाणी साठविणे, अशी योजना आखली गेली. या वाढीव पाण्याच्या संदर्भाने सांडव्याचे स्थैर्य पुन्हा तपासले गेले आणि त्याच्या तातडीच्या मजबुतीकरणाची आवश्यकता भासली. सांडवा मजबुतीचे काम 2005 आणि 2006 साली करण्यात आले.
दरम्यानच्या काळात कोयना प्रकल्पात बांधली गेलेली वीजगृहे, स्थापत्य आणि यंत्रे भूकंपाच्या सर्वांत तीव्र धक्क्याचा विचार करूनच बसवली गेली. अशा तऱ्हेने कोयना प्रकल्पाच्या बांधकामाचे भूकंपाच्या दृष्टीने पुनर्वसन करण्यात आले. मात्र, येथील विस्थापितांच्या यातना अद्याप कायम आहेत. पुनर्वसितांच्या 18 नागरी सुविधांचा प्रश्न शासन दरबारी लोंबकळत पडला आहे. अनेक विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही गंभीर आहे. शासनाने कोयना प्रकल्पाचे काम हाती घेतले, तेव्हा पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. मात्र, कोयना प्रकल्पानंतर हा कायदा झाला. कायदा करूनही गेली 52 वर्षे कोयना विस्थापितांची फरपट सुरुच आहे. त्यांना न्याय केव्हा मिळणार, हा प्रश्न आजही विचारला जात आहे.