सुरक्षा परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या सूचना
पुणे – पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत काम करताना पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे. समाजातील शेवटच्या घटक विचारात ठेवून कर्तव्य पार पाडावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केली.
तंत्रज्ञानातील नवनवीन बदल स्वीकारुन पोलीस दलाने देशातंर्गत घडामोडी तसेच गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मोदी यांनी सांगितले. “आयसर'(भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संस्थेच्या आवारात देशांतर्गत सुरक्षा या विषयावर या तीन दिवसीय परिषदेचा समारोप करण्यात आला. परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “देशातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस दलाची प्रशंसा मोदी यांनी यावेळी केली. पोलिसांचे काम, स्वरुप तसेच वेळा निश्चित नसतात. अशा परिस्थितीत पोलिसांवर ताण वाढतो. कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या सर्व गोष्टी विचारात ठेवून पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी’ असे मोदी यांनी सांगितले.
महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करा
महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करावे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे काम करावे. महिलांच्या तक्रारी स्वीकाराव्यात. त्यांच्या तक्रारींकडे कानाडोळा करू नये, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
ईशान्य भारतातील राज्यांत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या भागात देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेथे शांतता प्रस्थापित झाल्यानंतर तेथील विकासाचा वेग वाढेल. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करू नये.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान.