पुणे – काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराच्या घटना झाल्या, त्या अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ नवे कायदे आणि प्रस्ताव पुरेसे नाही. समाजातील राक्षसांना संपविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. मात्र, याबरोबरीने नागरिकांची मानसिकता बदलणे आहे ही गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
वारंवार घडणारे महिलांवरील अत्याचार आपल्यापुढे आव्हाने निर्माण करत आहेत. त्यामुळे आपण भेदभाव आणि अत्याचार रोखण्याचे वचन दिले पाहिजे. निर्भया प्रकरणात आम्ही सक्त कायद्याचे बिल आणले. काय झाले? प्रश्न सुटका का? मी कोणत्याही बिल किंवा नव्या कायद्याच्या विरोधात नाही. या घटनांवरुन सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत असल्याचे जाणवत आहे, अशावेळी केवळ कायदे मंजूर करून महिलांच्या विरोधात होणारी कृत्ये थांबतील, असे नाही तर त्यासाठी लोकांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे. महिला कमकुवत नसतात, हे महिलांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
कल्पना चावला, पी. व्ही. सिंधू यांच्यासह “डी.लिट’ प्राप्त झालेल्या शास्त्रज्ञ डॉ. टेस्सी थॉमस यांचे नाव जगभरात घेतले जाते. घरातल्या महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण केले गेले तर त्या संपूर्ण कुटुंबाचा कायाकल्प होतो. महिलेच्या सक्षमीकरणाशिवाय काही होणे अवघड असल्याचे सांगत, देशातली विद्यापीठे आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी महिलांच्या सबलीकरणासाठी विशेष लक्ष द्यावे, असे नायडू म्हणाले.