वाहन कंपन्या पुन्हा किमती वाढण्याच्या पवित्र्यात
पुणे – सरकारच्या नियमांनुसार वाहनांसाठी बऱ्याच मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी अतिरिक्त उपकरणे लागत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्यामुळे बऱ्याच वाहन कंपन्या जानेवारीपासून दरवाढ करणार आहेत. त्यामुळे नववर्षात वाहन खरेदीचे स्वप्न महागणार आहे.
मारुती सुझुकीने जानेवारीपासून दरवाढ करावी लागणार असल्याचे भांडवल बाजारांना कळवले आहे. मारुतीनंतर इतर कंपन्या दरवाढ करतात. टोयोटा, महिंद्रा ऍन्ड महिंद्रा या कंपन्यांनीही दरवाढीचे संकेत दिले. एप्रिलपासून बीएस-4 वाहनांची विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे ही वाहने महागणार आहेत. तर, हुंदाई कंपनीने सध्या कार्यरत वाहनांच्या किंमतीत वाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, बीएस-4 वाहने वाढीव किमतीचीच असणार आहेत.
कंपन्या म्हणतात…
गेल्या सहा महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या आहेत. मात्र, अगोदरच वाहन विक्री कमी होत असल्यामुळे वाहन कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. मात्र, अजूनही वाहन विक्री फारशी वाढलेली नसतानाही आता दरवाढ करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उपलब्ध नसल्याचे कंपन्या सांगत आहेत.
सध्या किती दरवाढ करावी लागणार, याचा हिशेब आम्ही करत आहोत. जानेवारीत आम्ही ही दरवाढ जाहीर करू. बीएस-4 दर्जाची वाहने अर्थातच अधिक महाग असणार आहेत. आम्ही ती वाहने बाजारात उपलब्ध करताना त्यासंबंधी माहिती तपशिलात जाहीर करणार आहोत.
– एन. राजा, व्यवस्थापकीय संचालक, टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी.