वडूज – परतीच्या पावसाने खटाव तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्यपालांनी शेती पिकांसाठी प्रतिहेक्टरी आठ हजार व फळ पिकांसाठी 18 हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यानुसार खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी 63 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
55 गावांमधील शेतकऱ्यांना ही मदत वितरीत करण्यासाठी जिल्हा बॅंकेकडे हा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खटाव तालुक्यातही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या पेचामुळे राज्यात काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
या कालावधीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी खटाव तालुक्यातील 140 गावांमधील पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले होते. तालुक्यातील दहा हजार 130 हेक्टर क्षेत्रावरील शेती पीक व फळ पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी 73 लाख 93 हजार 310 रुपये मदतीची मागणी करण्यात आली होती.
राज्यपालांनी केलेल्या घोषणेनुसार पहिल्या टप्प्यात मिळालेली दोन कोटी 63 लाख रुपयांची रक्कम जिल्हा बॅंकेकडे वर्ग करण्यात आली आहे. 55 गावांमधील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर ही मदत लवकरच जमा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाचवड, गोरेगाव वांगी, तरसवाडी, मरडवाक, भांडेवाडी, दरुज, पिंपरी, म्हासुर्णे, येळीव, नांदोशी, पळसगाव, मानेवाडी-तुपेवाडी, कातरखटाव, एनकूळ, रामोशीवाडी, पवारवाडी, नागनाथवाडी, फडतरवाडी, काळेवाडी, गारवडी, मोळ, दरजाई खटाव, वडी, लाडेगाव, गणेशवाडी, अंभेरी, गिरीजाशंकरवाडी, धकटवाडी, त्रिमली, भोसरे, खरशिंगे, लोणी, बुध, वडूज, तडवळे, मांडवे, काटकरवाडी, निढळ, उंचीठाणे, राजाचे कुर्ले, चोराडे, जांब, अंबवडे, गोपुज, कानकात्रे, कटगुण, गोरेगाव निम, थोरवेवाडी, रेवलकरवाडी, चिंचणी, भूषणगड, हुसेनपूर, अनपटवाडी या गावांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. खटाव तालुक्यात 22,059 शेतकऱ्यांचे 6186 हेक्टर जिरायत, 3481 हेक्टर बागायत व 462 हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे.