– दीपक पडकर
जळोची – सध्याच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भेट घेतली. या पाहणीत संपूर्ण मराठवाडा पिंजून काढत व शेतकऱ्यांना दिलासा देत, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातबारा कोरा, सरसकट कर्जमाफी देऊ, अशी आश्वासने दिली होती. आता खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्याने या आश्वासनांची पूर्तता होईल, अशी आस धरून शेतकरी बसले आहेत.
ऐन दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निवडणूक निकाल होऊनही वेळेत सरकार स्थापन होऊ न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांकडून शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मदत देखील जाहीर करण्यात आली होती. मात्र जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता सरकार स्थापन झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीला योग्य तो मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाऊ लागली आहे.
बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी, पिंपळी, दंड वाडी, काटेवाडी, सुपासह आदी भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे केले आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. सरकार स्थापन झाले असून शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची दखल घेत लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
शरद पवार, उध्दव ठाकरे यांनी आम्हांला शब्द दिला होता की, शेतक-यांची कर्जमाफी करु, आमचे मागील दुष्काळ आणि आत्ताच्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तरी आम्हांला लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन कर्जमाफी करावी. आणि दिलेला शब्द खरा करुन दाखवावा.
– विश्वास गावडे, गुणवडी, ता. बारामती
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार नक्कीच शेतक-यांचे हीत साधेल अशी अपेक्षा आहे. या सरकारने शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी आहे.
– रामदास वायाळ, शेतकरी.