मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे स्थिर सरकार स्थापन झाले आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्वच प्रक्रिया पार पडल्या आहेत. दरम्यान, यानंतर आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांच्या खातेवाटपाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
“आम्ही आता सगळी खाती एकत्रितपणे हाताळीत आहोत त्यामुळे कुठेही राज्याला पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण होईल असं कुठेही काही होत नाही आहे.”
–@CMOMaharashtra— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 1, 2019
राज्यातील सरकारची बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पार पडली, या सर्वातून आम्ही आता मोकळे झालो आहोत, त्यामुळे यापुढील काम वेगाने करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच खातेवाटपही एक दोन दिवसांत करु, तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही. म्हणून अद्याप खातेवाटप झालेले नाही मग आता काय होणार अशी काळजी करण्याचे कारण नसल्याचेही स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीवेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, छगन भुजबळ, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नीतीन राऊत या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सातही मंत्री सध्या सरकारचा कारभार चालवत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या राजकीय नाट्यानंतर महिनाभराने शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.