12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भूमिका मांडणार
औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भविष्यातील मार्गक्रमणासंदर्भात “फेसबुक’वर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमधून भाजपला त्या अडचणीत आणण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. आपल्या भविष्यातील रणनितीसंदर्भातील घोषणा 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरून केली जाईल, असेही पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये विचार करून पुढील मार्गाबाबतचा निर्णय घेणे आवश्यक आहे. स्वतःशी संवाद साधण्यासाठी 8-10 दिवसांचा अवधी आपल्याला हवा होता. सद्यस्थितीच्या राजकीय पार्श्वभुमीवर भविष्यातील रस्त्याच्या निवडीबाबतचा निर्णय घेणे गरजेचे आहे. भविष्यात काय करावे ? लोकांना आपण काय देऊ शकतो ? आपले बलस्थान काय आहे ? जनतेच्या अपेक्षा काय आहेत ? या सर्व मुद्दयांसंदर्भात आपण विचार करणार असून 12 डिसेंबरला ही भूमिका मांडणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीडमधील परळी मतदारसंघातून त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला आहे. आपण आपला पराभव स्वीकारला असून पक्षाच्या सर्व बैठकांनाही आपण उपस्थित राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. “पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले.
आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.’ असे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले असल्यामुळे त्या भाजपवर काही बॉम्ब टाकण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. मात्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी ही शक्यता फेटाळली असून पंकजा भविष्यात राज्यात भाजपला सक्षम करण्यासाठी कार्यरत राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.