मायणी – मुख्य बाजारपेठ असलेल्या मायणी (ता. खटाव) येथील मुख्य रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक, बाजारकरू व पादचारी त्रस्त झाले आहेत. केवळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मायणी गावात ही आफत ओढवली असल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत.
मायणीत रविवारी पालेभाज्या बाजार भरत असतो. बाजारासाठी व इतर दिवशी विविध कामांसाठी मायणी जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या सर्व गावांचे नागरिक येतात. येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मराठी शाळेपासून ते शिंदेवाडी रोड जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत सतत वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मुख्य रस्त्याला दोन्ही बाजूला रविवारी बाजारकरू बसत असल्याने व इतर दिवशी वाहन चालक बेशिस्तपणे आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून गप्पा मारत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
मायणी हे गाव जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठे गाव असून परिसरातील सर्वात महत्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. येथे मेडिकल कॉलेज, महाविद्यालये, शाळा, बॅंका, पोलीस स्टेशन, टपाल कार्यालय, तलाठी कार्यालय, महावितरण कार्यालय, कृषी कार्यालय, भूमापन कार्यालय आधी कार्यालयात कामासाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. मुख्य रस्त्यावर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानक असून त्याच्या शेजारी भाजीपालाचा बाजार भरत असतो. त्यामुळे वाहनधारक व मुख्य पेठेतील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण यांच्यामुळे प्रामुख्याने सतत या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा पादचाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांनी अनेक ठिकाणी अतिक्रमणे केलेली दिसून येत आहेत. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन आठवडी बाजाराला शिस्त लावणे आवश्यक आहे तर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या रस्त्यापासून थोड्याच अंतरावर मायणी पोलीस दूरक्षेत्र आहे वाहतूक कोंडीकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमधून दबक्या आवाजात सुरू आहे. खाजगी वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने पोलिसांनीही लक्ष देऊन यावर उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.