सोनिया गांधी यांच्याकडून संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोप
नवी दिल्ली : भाजपकडून महाराष्ट्रात तीन पक्षांच्या आघाडी सरकारला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी
निर्लज्जपणे लोकशाहीची चेष्ठा केल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. कॉंग्रेस संसदीय पार्टीच्या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अभूतपूर्व आणि नींदनीय काम केल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी केली अहे.
राज्यपालांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सूचनांप्रमाणेच काम केले, यात काहीही शंका नाही. भाजपच्या स्वतःच्या अहंकारामुळे आणि अतिआत्मविश्वासामुळे निवडणुकीपूर्वीची अघाडी कायम राहिली नाही. तीन पक्षांच्या आघाडी सरकारला रोखण्यसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितल्यावर मोदी-शहा सरकार उघडे पडले. आता तिन्ही पक्ष एकसंध आहेत आणि भाजपच्या एकाधिकारशाहीला रोखण्याचा दृढ निश्चय केला आहे, असे गांधी म्हणाल्या. या बैठकील कॉंग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार उपस्थित होते.
मोदी-शहा सरकारच्या सौजन्याची दिवाळखोरी आहे, हे उघड आहे. देशासमोरील गंभीर समस्या कशा हाताळायच्या याबाबत या सरकारकडे कोणताही उपाय नाही. देशासमोरील आर्थिक समस्या तीव्र आहेत. विकास घटत आहे, बेरोजगारी वाढत आणि गुंतवणूक होत नाही आहे. शेतकऱ्यांची, व्यापारी, लहान उद्योगांची स्थिती अतिशय वाईट आहे. निर्यातीचे प्रमाण घटले आहे. आवश्यक अन्नधान्याच्या वस्तूंच्या किंमती भडकल्या आहेत. या समस्या सोडवण्याऐवजी मोदी-शहा सरकार केवळ आकडेवारीचा खेळ करत आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
आरईसीपी, एनआरसी, इलेक्टोरल बॉन्ड, हेरगिरी आणि 370 कलमावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जम्मू काश्मीरमधील विशेष दर्जा काढून लोकशाहीची चेष्ठा केली गेली, असे त्या म्हणाल्या.