“सूर्य मावळतीला जात असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे…’ शिवसेनेच्या मुखपत्राने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पर्वाच्या शुभारंभाचे या शब्दांत वर्णन केले आहे. ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, अशा उद्धवजींकडे सरकार चालवण्याचा अनुभव नाही. पण त्यांच्या सोबतीला अनेक दीर्घानुभवी मंत्री असणार आहेत. 1978 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांचे वय अवघे 38 वर्षांचे होते. तरीदेखील त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार उत्तमरीत्या चालवले. 1980 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद बॅरिस्टर. अ. र. अंतुले यांनी सांभाळले. त्यांनादेखील मोठा दीर्घ अनुभव होता, अशातला भाग नाही. पण त्यांनी काही लोकाभिमुख निर्णय घेतले व नोकरशहांवर त्यांचा वचक होता.
राजीव गांधी राजकारणात आले, तेव्हा या पायलटला राजकीय डावपेच कसले कळणार!, अशी थट्टा करण्यात आली. परंतु ते एक यशस्वी पंतप्रधान ठरले. देशात दूरसंचार व संगणकक्रांती त्यांनीच आणली. संसदीय राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपला एक प्रभाव निर्माण केला. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारात मंत्रीपद भूषवले नसताना एकदम मुख्यमंत्री होऊनही, या पदावरील त्यांची कारकीर्द चमकदार ठरली. तेव्हा उद्धवजींना प्रशासनाचा अनुभव नसला, तरी तीस वर्षे ते राजकारणात आहेत. शिवसेनेच्या अखत्यारीत मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या महापालिका आहेत आणि तेथील कारभाराचा तसेच पक्षातील मनुष्यबळ व्यवस्थापनाचा उद्धवजींना अनुभव आहे. अर्थात यावेळी त्यांना कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत संसार करायचा आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना विसर्जित होईल, असे भाकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. मात्र उद्धव यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत युती म्हणून नव्हे, तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवूनही शिवसेनेला 63 जागा जिंकून दिल्या होत्या.
1995 साली जेव्हा मनोहर जोशी सरकार आले, तेव्हा त्याचा रिमोट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता. आता मात्र रिमोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असेल. कारण या सरकारचे शिल्पकार पवारच आहेत. यावेळी विरोधी बाकांवर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशीष शेलार यांच्यासारखे सदस्य असतील आणि त्यांच्या भडिमारास सरकारला तोंड द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या डोक्यावर पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज असून, त्यामुळे उधळपट्टीला आवर घालूनच कारभार करावा लागेल. किमान समान कार्यक्रमाला बांधील राहूनच काम करताना, वचननाम्याला मुरड घालावी लागेल. तसेच विविध योजनांसाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागणार असल्यामुळे, अगोदरची कटुता बाजूला ठेवून मोदी सरकारबरोबर संवाद ठेवावा लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसारखे मित्र याबाबत कामी येतील.
या सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करताना, केवळ तात्कालिक मलमपट्टीवर भर न देता, शेती लाभदायक कशी ठरेल याची योजना आखली पाहिजे. रोजगारप्रधान लघु व मध्यम उद्योग कसे वाढतील याची काळजी घेऊन, तरुणांना रोजगारकुशल बनवण्याच्या योजनेवर सर्वाधिक भर हवा. फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत कौशल्यविकासाच्या नावाखाली बोगस संस्थांना अनुदाने देण्यात आल्याचे आरोप झाले होते. तसेच बुलेट ट्रेनसारख्या योजना गुंडाळलेल्या बऱ्या. मागच्या सरकारने भरमसाठ पगार देऊन पुठ्ठ्यातील व्यक्तींना सल्लागार म्हणून नेमले होते. त्यांना तात्काळ नारळ दिला पाहिजे. उद्धव हे अगदी लहानपणापासून शांत व समजूतदार आहेत. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून त्यांना शाळेत कधीही कोणतीही खास वागणूक मिळाली नाही. राज सुरुवातीला राजकारणात आले व उद्धव नंतर. प्रारंभी उद्धव पडद्यामागे क्रियाशील होते. 11 एप्रिल 1990 रोजी मुलुंडचे शिवसेना शाखाप्रमुख शिशिर शिंदे यांच्या कार्यक्रमाद्वारे उद्धवजींनी राजकारणात पदार्पण केले. 1992 मध्ये उद्धव यांच्या सूचनेवरूनच शिशिर शिंदे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नामनिर्देशित झाले. उद्धव यांनी जे. जे. इन्स्टिट्यूटमधून उपयोजित कला या विषयातील पदवी संपादन करून, अन्य दोन मित्रांच्या भागीदारीत “चौरंग’ नावाची जाहिरातसंस्था स्थापन केली होती.
1985 मधील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारमोहिमेत उद्धवजी सामील झाले होते. 1992च्या मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेनेचे एक पदाधिकारी माधव देशपांडे यांनी शिवसेनेपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मोठी होत चालली आहे. उद्धव आणि राज हे पक्षाच्या कारभारात अवाजवी ढवळाढवळ करत आहेत, असा आरोप केला होता. या टीकेला उत्तर म्हणून बाळासाहेबांनी राजीनामा देण्याचे धक्कातंत्र अवलंबले. लगोलग शिवसैनिक “मातोश्री’वर जमू लागले आणि बाळासाहेबांनी पक्षांतर्गत विरोध चिरडून टाकला. राज किवा उद्धव यांना पक्षाचा सर्वाधिकारी नेमावे, असे आपल्या डोक्यातही आले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु उद्धवजींना विधानसभा निवडणूक लढू देण्यास बाळासाहेबांनी तेव्हा विरोध केला होता. मात्र उद्धवजी पक्षाचे कार्य चिकाटीने करत राहिले. 1994 मध्ये नाशकात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या संयोजनात उद्धवजींनी आपली संघटनशक्ती दाखवून दिली. त्यांच्यावर शीतल व्यक्तिमत्त्वाच्या मॉंसाहेबांचा प्रभाव आहे.
राज आक्रमक, तर उद्धव मवाळ. रमेश किणी प्रकरणात उद्धव हे राज यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. ते राज यांच्यासोबत सीबीआयच्या विशेष न्यायालयातही गेले होते. 1997 मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवजींच्या पसंतीचे उमेदवार बाळासाहेबांनी दिले. शिवसेनेला यशही मिळाले. या निवडणुकीतच शिवशक्ती आणि भीमशक्ती यांनी एकत्र यावे, असे आवाहन उद्धवजींनी केले. तेथून सेना बदलायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर भविष्यात केवळ अमुक समाजाविरुद्ध वा तमुक प्रांतीयांविरुद्ध नकारात्मक भावना रुजवण्याचे धोरण शिवसेनेने पूर्णतः मागे ठेवले पहिजे. शिवसेनेकडे प्रबोधनकारांचा वारसा आहे. सत्तेपासून वंचित राहिलेल्या जातींना शिवसेनेने सत्तेत प्रतिनिधित्व दिले, घराणेशाहीच्या वारसदारांपलीकडे जाऊन, बिनओळखीच्या गोरगरिबांना सत्तापदे दिली. शिवसेनेकडे असलेला हा एक मोठा गुण आहे. शिवसेना हा सर्वसामान्यांचाच पक्ष आहे. आगामी काळात या पक्षाने बहुजनवादी आणि लोकाभिमुख राजकारण करत, आर्थिक-सामाजिक प्रश्न सोडवले, तर त्यात राज्याचे भलेच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी नवा महाराष्ट्र घडवावा. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!