जीवनावश्यक वस्तूंच्या साठवणुकीवर निर्बंध
नगर – केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध लागू केलेले असून घाऊक 50 मे.टन व किरकोळ व्यापा-यासाठी 10 मे.टन कांदा साठा निश्चित करण्यात आलेले आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्या विरुध्द सक्त कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील काही बाजार समितीमध्ये कांदा साठवणुकीबाबत तपासणी केली असता अशा प्रकारच्या साठवणुकीचा कांदा कुठेच आढळून आला नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले.
राज्य शासनाने कांदा साठवणुकीवर घाऊक व्यापाऱ्यासाठी 50 मे.टन व किरकोळ व्यापाऱ्यासाठी 10 मे.टन साठयावरील निर्बंध लागू केले असून दिनांक 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत लागू राहणार आहेत. जिल्ह्यात नागरिकांना कोठेही बेकायदेशीर साठेबाजी निदर्शनास आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागास संपर्क साधावा.
बेकायदा साठेबाजीचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व काळा बाजार प्रतिबंध आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. कांद्याबरोबरच डाळी व इतर जीवनावश्यक वस्तूंचीही साठेबाजी करू नये असे निर्देश आहेत.