हेल्मेट नसल्याने मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
सुरक्षा साधनांचा वापर नसल्याने अपघाती मृत्यू
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा अहवाल
हेल्मेट, सीटबेल्ट वापराकडे डोळेझाक जीवावर
पुणे – अनेकदा केवळ नागरिकांकडून वाहतूक पोलिसांनी दंड करू नये, म्हणून सुरक्षा साधनांचा वापर केला जातो. फक्त दंडाची रक्कम वाचविण्याच्या नादात नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. कठोर नियम आणि कायदे करुन देखील बहुतांश नागरिक हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करत नाहीत. या बेपर्वाईमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या अहवालामध्ये नमूद केले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार देशभरात हेल्मेट आणि सीटबेल्टची सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेक जण केवळ वाहतूक पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करतात.
सन 2018 मध्ये हेल्मेट न घातल्याने महाराष्ट्रात 3,520 वाहनचालकांचा मृत्यू, तर 5,795 वाहनचालक जखमी झाले असून देशातील 36 राज्यांपैकी महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सहप्रवाशांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून 1,732 सहप्रवाशांचा मृत्यू आणि 4,176 सहप्रवासी जखमी झाले आहेत.
यासह सीटबेल्ट नसल्याने सन 2018 मध्ये 602 वाहनचालकांचा मृत्यू झाला होता. तर 1400 वाहनचालक जखमी झाले आहेत. तर सीटबेल्ट नसल्याने 1054 सहप्रवाशांचा मृत्यू, तर 3,234 सहप्रवाशी जखमी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेळीच सावध होऊन स्वतःसाठी का होईना, सुरक्षासाधने वापरणे आवश्यक आहे.
सीटबेल्टचे फायदे
सीटबेल्टमुळे डोके स्टेअरिंगवर आपटत नाही.
अपघातसदृश्य स्थितीमध्ये वाहनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
वाहनाबाहेर फेकले जात नाही.
अपघातातून वाचण्याची शक्यता 70 टक्के अधिक असते.
हेल्मेट वापरण्याचे फायदे
हेल्मेटच्या वापराने कोणत्याही प्रकारचे शारीरिक आजार होत नाहीत.
डोक्याला इजा होत नाही.
अपघातानंतर मेंदूपर्यंत इजा पोहोचण्याची शक्यता कमी होते.
अपघात झाल्यास जीवितहानी टळण्याची शक्यता वाढते.