मुंबई : 26/11 सारखा हल्ला पुन्हा झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी मुंबई पोलिस दल आता सज्ज आहे. अतिनिष्णात प्रशिक्षित कमांडोमुळे शहरवासीयांच्या जीवितासोबत शहरातील रस्ते आणि मालमत्तांचेही रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडू. अत्याधुनिक शस्त्रे आणि लढाऊ वाहने यांनी पोलिस दल सज्ज आहे, असे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे म्हणाले. 26/11च्या अकराव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांची पीटीआयने मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकांनी पोलिसांचे नाक आणि कान बनावे, आम्ही आमच्या सहकाऱ्यांना शीघ्र प्रतिसाद दलाला प्रशिक्षित केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि अत्यंत प्रगत शस्त्रास्त्रे यामुळे मुंबई पोलिस हे देशारतील सर्वात प्रबळ दल आहे, असे ते म्हणाले. दहशतवाद हा देशाचा शत्रू आहे. त्याचा प्रतिकार सर्वांनी मिळून करायला हवा. लोक संशयितांची माहिती आम्हाला देत आहेत.त्यामुळे हे नागरिक हेच आमचे डोळे आणि कान बनले आहेत. हा नागरिकांच्या विचारातील बदल उत्साहपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या संरक्षणाशी संबंधित विविध यंत्रणांमधील समन्वय सुधारला आहे. समुद्र मार्गे होणारा हल्ला विफल करण्यासाठी तटरक्षक दलाशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. त्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. शहरात सुमारे पाच हजार सीसीटिव्हीच्या माध्यमांद्वारे बारिक सारिक घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यात आणखी पाच हजार 600 कॅमेऱ्यांची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे.