– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती पिकांना हेक्टर 50 हजार रुपये व जिरायती शेतीमधील पिकांना हेक्टर 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी. नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी, या मागणीसाठी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार सुरेश गोरे यांनी केले.
खेड तालुक्यात सुरुवातीला अतिवृष्टी व नंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेली पिके वाया गेली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून फळबागांना हेक्टरी 18 हजार व जिरायती पिकांना हेक्टरी 8 हजार रूपये मदत जाहीर केली. हे अनुदान नुकसानीच्या मानाने अत्यंत कमी आहे. त्यात बागायती शेतीला हेक्टरी 50 हजार व जिरायती शेतातील पिकांना हेक्टर 25 हजार अनुदान मिळण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी, अशीही मागणी या आंदोलनात करण्यात आली. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत त्यांचे पंचनामे तत्काळ करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, संपर्क प्रमुख संजय डफळ, जेष्ठ नेते अशोक खंडेभारड, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्या ज्योती अरगडे, सुरेश चव्हाण, राजू जवळेकर, उर्मिला सांडभोर आदी सहभागी झाले होते.