शहरातील वाहतूक नियोजनाच्या बैठकीचे निमंत्रण न दिल्याच्या कारणावरुन
कराड – कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारी पालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कराड शहरातील वाहतूक व्यवस्था हा महत्त्वाचा विषय असून या बैठकीस कोणत्याही प्रकारचे निमंत्रण नसल्याच्या कारणावरून भाजपाचे नगरसेवक सुहास जगताप, फारूक पटवेकर व लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील व इतर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य परिवहनचे अधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी व स्थायी समिती सदस्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी लोकशाही आघाडीचे सौरभ पाटील याबाबत नाराजी व्यक्त करताना म्हणाले, शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटावा यासाठी लोकशाही आघाडी वारंवार प्रश्न मांडत आहे. आम्हाला शहरातील समस्यांची जाण आहे. शहरातील नागरिकांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासन सजग आहे, हे कौतुकास्पद आहे. परंतु या प्रश्नामध्ये फक्त स्थायी समितीला सामावून घेणे चुकीचे आहे. वाहतुकीचा प्रश्न हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न होता.
मग ठराविक नगरसेवकांनाच या बैठकीसाठी सामावून का घेण्यात आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, वाहतूक समस्येबाबत यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. वाहतूक समस्या ही शहरातील अत्यंत ज्वलंत समस्या झाली आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वच नगरसेवकांना एकत्रित करणे गरजेचे असताना स्थायी सदस्यांनाच एकत्र करून बैठक बोलावण्यात का आली?
स्थायी समितीची बैठक बोलावण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असतो. मात्र या बैठकीचे नियोजन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे. त्याबाबतची माहितीही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली होती. ही बैठक स्थायी समितीची नसून केवळ स्थायी सदस्यांची घेण्यात आली आहे. त्यामुळे समितीची ही अधिकृत बैठक आहे, असे म्हणता येणार नाही, असे मत सौरभ पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पत्रकारांनाही या महत्त्वाच्या बैठकीत सामावून घेण्यात आले नव्हते. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता या बैठकीत अंतर्गत चर्चा करण्यात येणार असून सायंकाळी पुन्हा एक बैठक आयोजित करून त्यात सर्वांना सामावून घेण्यात येईल. तेंव्हा पुन्हा एकदा या वाहतूक प्रश्नाबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येतील, असे मुख्याधिकारी डांगे यांनी सांगितले.
बैठकीच्या नियोजनाबाबत चर्चा…
कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीचे नियोजन करण्याचा अधिकार हा नगराध्यक्षांना असतो. शहरातील वाहतूक व्यवस्था हाही नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा व ज्वलंत प्रश्न होता. याबाबत चर्चा घडवून आणण्यात आली हे कौतुकास्पद आहेच. मात्र बैठक बोलाविण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असताना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्याचे नियोजन का केले असावे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.