नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाशिवाघाडीसंबंधातील वक्तव्याने सत्तास्थापनेबाबत राज्यात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अशातच आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावरून राजकीय वर्तुळात भाजप-राष्ट्रवादीचे सत्तासमीकरण जुळल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तरुण भारतच्या अग्रलेखातून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. सिंहासन पटकावण्यासाठी पवारांनी केलेले ‘खंजिरी प्रयोग’ आजही ध्यानात, अशी टीका तरुण भारतमध्ये करण्यात आली आहे.
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील अत्यंत चाणाक्ष नेते मानले जातात. मुख्यमंत्रिपदापासून ते संरक्षणमंत्रिपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या पवार यांचा राजकीय क्षेत्रातील दबदबा टिकून असला, तरी विश्वासार्हतेच्या स्तरावर पवार यांची पाटी कोरी आहे. सिंहासन पटकावण्यासाठी पवार यांनी केलेले ‘खंजिरी प्रयोग’ आजही अनेकांच्या ध्यानात असतील. याच राजनीतीतून सोयीस्कररीत्या मारलेल्या कोलांटउडय़ा, सोनिया गांधींची मनधरणी करून नंतर त्यांच्याच परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करीत रोवलेली राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ, त्यानंतर पुन्हा काँग्रेसशी जुळवलेले सूर व 2014 मध्ये पारंपरिक विरोधक भाजपाला न मागताच दिलेला पाठिंबा, असे कल्पनेपलीकडील राजकारण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सुरुवातीला आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार, असे सांगणाऱया पवारांनी सेना व भाजपाचे वाजल्यानंतर सत्तास्थापनेकरिता हालचाली केल्या.
काँग्रेस, सोनिया गांधींसोबत चर्चा केल्या. परंतु, तेच पवार शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनियांशी चर्चा झाली नसल्याचे सांगत ‘सत्तास्थापनेबाबत भाजपा-शिवसेनेलाच विचारा,’ असे म्हणत असतील, तर त्याला काय म्हणायचे? त्याअर्थी पवार यांचे राजकारण समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे वक्तव्य योग्यच म्हणावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पवार यांच्यातील संबंध तसे बऱयापैकी मधुर राहिले आहेत. मोदी यांनी ‘राष्ट्रवादीचे सदस्य कधीही राज्यसभेच्या वेलमध्ये दाखल झालेले नाहीत,’ अशा शब्दात एनसीपीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणायचा की साखरपेरणी, असा प्रश्न कुणालाही पडावा. त्यामुळे गुरुशिष्यामृतयोगाच्या जुळणीतून कुणाची शिकार तर होणार नाही ना, याकडेही लक्ष ठेवावे लागेल. काँग्रेस हा काही साधूसंतांचा पक्ष नाही. आजवर या पक्षानेही सत्तेसाठी अनंत तडजोडी केल्या. अशा पक्षाला शिवसेना अस्पृश्य वाटावी, यासारखा मोठा विनोद नाही, असे तरुण भारतमध्ये सांगण्यात आले आहे.