अशोक सुतार
सांगली जिल्ह्यातील विटा शहरापासून खानापूर रस्त्यावर जवळच रेणावी गावात रेवणनाथांचे जागृत तीर्थस्थान आहे. रेवणनाथांचे वास्तव्य रेणावी गावात होते. येथेच त्यांनी जागृत समाधी घेतली. रेवणनाथ यांना रेणावी येथूनच शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन झाले. तेव्हापासून रेवणनाथांची पालखी दरवर्षी फाल्गुन शुद्ध त्रयोदशी दिवशी शिखर शिंगणापूरच्या महादेव भेटीला जाते, अशी येथील परंपरा आहे.
फार पूर्वीपासून ती सुरू आहे. रेवणनाथ यांनी समाधी घेतल्यानंतर तिथे त्यांची स्वयंभू मूर्ती आहे. रेवणसिद्ध नाथ यांना आत्मलिंग असून या ठिकाणी बाराही महिने पाणी असते. महाशिवरात्रीला परिसर भाविकांनी फुलून जातो. पाच दिवस यात्रा सुरू असते. देवाची महापूजा मध्यरात्री 2 वाजता होते. संध्याकाळी चार वाजता पूजा केली जाते. रेवणनाथांचे मंदिर व स्वयंभू मूर्ती पाहण्यासारखी आहे. हे मंदिर एखाद्या राजवाड्यासारखे दिसते.
रेवणनाथांच्या मंदिरात अनेक महत्त्वाच्या देव व देवतांच्या मूर्ती आहेत. रेवणनाथांचे दोन शिष्य बसरसिद्ध व मरळसिद्ध यांची समाधीस्थळं आहेत. नवनाथ पंथामध्ये सुरुवातीला दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांना गुरुदीक्षा दिली. नंतर या दोघांनी इतर नाथांना मार्गदर्शन केले. नाथानी 84 ऋषीमुनींना केलेला हा उपदेश पटला, त्यांनी त्याचा सर्वत्र प्रसार केला, त्यांना सिद्ध असे म्हटले आहे. नवनाथ यांनी नाथ संप्रदायाची पायाभरणी केली आणि 84 सिद्ध यांनी संप्रदायाचा सर्वत्र प्रसार केला. गुरू दत्तात्रेयांनी नाथ संप्रदायाला मार्गदर्शन केले, अशी कथा काही ग्रंथांत आढळते.
रेणावी येथे एक शिवकालीन आधारित परंपरा अजूनही पाळली जात आहे. जेव्हा अफजलखान विजापुराहून वाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला येत होता, त्यावेळेस त्याने आजूबाजूची गावे, मंदिरे पाडली. पंढरपूरहून येताना रेणावी गावाजवळ तो आला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी रेवणनाथांच्या मंदिराला चुना फासला होता. याचे कारण म्हणजे मंदिर हे मशिद वाटावी व मंदिराचे संरक्षण व्हावे. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला नाही. आजही गावकरी या घटनेची आठवण म्हणून फेब्रुवारी महिन्यात मंदिराला पांढरा रंग लावतात.
या मंदिर परिसरात अष्टविनायक मंदिर, नवग्रह मंदिर आहे. नवग्रह मंदिरातील सात घोड्यांच्या रथावर बसलेली सूर्याची मूर्ती सुंदर आहे. विशेष म्हणजे, मंदिराच्या पाठीमागे पांढऱ्या भस्माची छोटी टेकडीच आहे. मंदिरात पूजेवेळी या भस्माचा वापर केला जातो. रेवणसिद्ध देव, रेणावी ट्रस्ट मंदिराचा कारभार पाहात आहे. ट्रस्टमार्फत भाविकांसाठी भक्तनिवासाचे काम सुरू आहे. मानसिक शांती व अध्यात्मिकदृष्ट्या हे तीर्थस्थळ महत्त्वाचे आहे
(समाप्त)