सुपा – सतत पडणाऱ्या पावसाने सुपा परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, मका व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे सुरू झाले असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी सरसावले आहेत.
पारनेर तालुक्यातील पळवे, कळमकरवाडी येथील पिकांचे पंचनामे कृषी अधिकारी बनसोडे व ग्रामसेवक घुले यांनी केले. तालुक्यात प्रथमच अधिकारी शेतकऱ्यांना आपल्या शेतात उपस्थित राहावे असे आवाहन करत प्रत्येक शेतात जाऊन शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत होते.
गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करतांना शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून यावर्षी उशिरा परतीच्या पावसाने सर्व पिकांचे होत्याचे नव्हते झाले. सुपा परिसर कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. चालुवर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे.
मात्र सतत पडणाऱ्या पावसाने कांदा मोठ्या प्रमाणात शेतात सडून गेला तर बदलत्या हवामानामुळे या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान आमदार निलेश लंके यांनी नुकतीच पारनेर येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर काही अडचणी असतील तर त्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. आ. लंके हे स्वत: अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे करत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.