पुणे – जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झाल्यामुळे उरलेली पिके तरी वाचतील, या आशेने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाची गडबड सुरू झाली असून, तर दुसरीकडे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. परंतू, आधीच राज्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पंचनामे कधी होणार, शेतकऱ्यांना त्याचा फायदा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाळा संपला, नेहमीप्रमाणे यंदाही परतीचा पाऊस हुलकावणी देणार, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक निवांत होते. जिल्ह्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भातशेती चांगली झाली. तर पश्चिम भागात समाधानकारक पाऊस झाला नसला, तरीही खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतीला त्याचा फायदा झाला. मात्र, ऐन ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने जोरदार आगमन करत संपूर्ण महिनाभर जिल्ह्यात ठाण मांडले. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नोव्हेंबर सुरू होऊनही पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे उरले-सुरली पीकांचेही नुकसान होणार अशी स्थिती होती. परंतू, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर अन्य भागात हवामान कोरडे होते. त्यामुळे उरलेली पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.