सर्वसामान्यांची कामे अद्यापही खोळंबलेली
पिंपरी – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिकेचे थंडावलेले कामकाज आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरही थंडच असल्याचे दिसून येत आहे. निवडणुका आणि त्यापाठोपाठ आलेल्या दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतरही अनेक अधिकारी रुजू न झाल्यामुळे पालिकेच्या कामकाजाला खीळ बसली आहे. त्यातच आयुक्तही आठवडाभराच्या रजेवर असल्यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबल्याचे चित्र पालिकेत पहावयास मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात जाहीर झाली होती. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यातच विधानसभेची निवडणूक असल्याने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेकडे पाठ फिरविली. निवडणुका संपताच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. दिवाळी संपून आता आठवडाभर उलटला आहे. सोमवारी (दि.4) पासून पालिकेच्या कामकाजाला वेग येईल आणि गेल्या दीड महिन्यापासून सर्वसामान्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे. निवडणूक आणि दिवाळी सुट्टी यातून पालिकेचे प्रशासन अद्याप बाहेर पडलेले नाही.
त्यातच आयुक्तांनी आठवडाभराची सुटी घेतली आहे. याशिवाय अनेक अधिकारी व कर्मचारी अद्यापही रजेवर असल्याचे समोर आले आहे. निवडणूक विभागात तात्पुरती बदली झालेले अनेक कर्मचारी व अधिकारीही पालिकेकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे कामे खोळंबलेल्या स्थितीत आहेत. तर पालिकेतील पदाधिकारी राज्यातील सरकार स्थापनेकडे “डोळे’ लावून बसले आहेत. पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबई वाऱ्या सुरू आहेत. तर नगरसेवकही पालिकेकडे फिरकेलेले नाहीत. विरोधकांचीही अशीच स्थिती असून विरोधी पक्षाचे मोजकेच नगरसेवक आज पालिकेत दिसून आले. मात्र पालिकेतील “थंड’ वातावरण पाहून त्यांनीही आपल्या प्रभागात जाणेच पसंद केले. गेल्या दीड महिन्यापासून खोळंबलेले कामकाज सुरूळीत कधी होणार याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.