ऐन कापणीच्यावेळी पावसाने थैमान घातल्याने यंदा नगण्य उत्पादन हाती येण्याची भीती
राजगुरूनगर – खेड तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसाचा तब्बल 2 हजार 619 शेतकऱ्यांना फटका बसला असून त्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवून देण्यात आला आहे. यात सर्वाधिक नुकसान हे भात उत्पादक शेतकऱ्यांचे झाले असून ऐन कापणीच्यावेळी आलेल्या पावसामुळे भात हातचा गेला असून यंदा भाताचे अगदी नगण्य उत्पादन हातात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 5) पर्यंत 57 गावांतील 1643 शेतकऱ्यांच्या 552.49 हेक्टर क्षेत्राचा कृषीविभागाकडून पंचनामा पूर्ण करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी दिली.
ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भात शेतीसह, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा, भाजीपाल्यासह अन्य पिके उद्ध्वस्त झाले आहेत. प्रामुख्याने भात उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. कर्जबाजारी होऊन शेती वाचविण्याचे काम शेतकरी करत असताना अचानक निसर्गाने शेतकऱ्यांचे दिवाळे काढले असल्याने त्याला आर्थिक विंवचनेने ग्रासले आहे. तालुक्याच्या अनेक भागात महिन्याभरापासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. काही भागात पावसाची संततधार राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत 57 गावांतील 1643 शेतकऱ्यांच्या 552.49 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
काढणीनंतर केवळ पावसामुळे शेतातून पीक बाहेर काढता आले नसल्याने काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. काढणी करून ठेवलेल्या ठिकाणीच ते पीक कुजले आहे. तालुक्यात ऐन सुगीत सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या शेतातील भात वाफ्यात पाणी शिरल्याने भाताच्या सरी पाण्यावर तरंगत आहेत. त्यामुळे गवतासह भाताचे नुकसान झाले आहे. भाताचे दाणे (लोंबे) उबविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अद्यापही पाऊस पडत असल्याने सरासरी उत्पादनात यावर्षी घट होणार आहे. अद्यापही अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे भात, भुईमूग, सोयाबीन, मका, आदी पिकांचे नुकसान
झाले आहे.
2619 शेतकरी बाधित –
खेड तालुक्यातील नजर पाहणीत 84 गावे, तर 2619 शेतकरी बाधित झाले आहेत. तर कांदा : 128.6 हेक्टर, भात : 878.0, सोयाबीन : 143.8, भाजीपाला : 287.6 हेक्टर असे एकूण : 1438 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडून तयार करून शासनाकडे पाठवून देण्यात आला आहे.
निम्म्यापेक्षा अधिक घट –
भात फुलोऱ्यात आल्यावर भात पिकांना पावसाच्या पाण्याबरोबरच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते यामुळे धनामध्ये तांदळाची उत्पत्ती होते. यावर्षी पावसाचा जोर ओसरला नसल्याने उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट आली असून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला असल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे.