औरंगाबाद : अवकाळी पावसाने दिलेल्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात चार दिवसांत दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. अर्थात, संबंधित शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवण्यामागची नेमकी कारणे अजून स्पष्ट झालेली नाहीत.
नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी तीन तर बीड जिल्हात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली.
अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील 30 लाख हेक्टरवरील पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्या विभागातील सोयाबीन, ज्वारी, मका आणि कापूस या पिकांची अवकाळीने वाताहत केली आहे. त्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांवर यातनांचा डोंगर कोसळला आहे.