पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन
कोलकाता : “चंद्रयान -2′ एक यशस्वी मिशन होते आणि त्यामुळे तरुणांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्वाकांक्षी मोहिमेचे कौतुक केले.
कोणताही देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय प्रगती करू शकत नाही. विज्ञान हे एखाद्याने झटकन नूडल्स तयार करावीत, तसे नसते. त्यामुळे लोकांनी वैज्ञानिक प्रयोगांमधून तात्काळ निकाल मिळेल, अशी अपेक्षा धरू नये. वैज्ञानिक शोध कदाचित सध्याच्या पिढीला त्वरित मदत करू शकणार नाहीत पण भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरू शकतील, असेही त्यांनी सांगितले. पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना ते बोलत होते.
आपल्या वैज्ञानिकांनी “चांद्रयान 2′ साठी खूप कष्ट घेतले. मात्र सर्वकाही नियोजनाप्रमाणे होऊ शकले नाही. पण तरिही ही मोहिम यशस्वी झाली. जर व्यापक दृष्टीकोनातून बघितले तर भारताच्या वैज्ञानिक यशाच्या यादीमध्ये हे ही मोहिम म्हणजे महत्वाचे पाऊल ठरल्याचे आढळून येईल, असे पंतप्रधान म्हणाले.
आजपर्यंत संपर्क साधला न गेलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 7 सप्टेंबर रोजी पहाटे लॅंडिंगच्या अगदी आधी “चंद्रयान -2′ च्या विक्रम लॅंडरचा इस्रोच्या ग्राऊंड स्टेशनबरोबरचा संपर्क तुटला होता. मात्र या मोहिमेमुळे युवकांबरोबरच ज्येष्ठांमध्येही वैज्ञानिक चिकित्सकवृत्ती निर्माण झाली होती. विज्ञानामध्ये कोणतेही अपयश नाही आणि केवळ प्रयत्न, प्रयोग आणि यश आहे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवून पुढे गेल्या तर तुम्हाला विज्ञान किंवा तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. विज्ञानाची आवड ही वैज्ञानिक स्वभावाप्रमाणे असली पाहिजे. ही उत्सुकता वाढवणे आणि त्यांना व्यासपीठ देणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला मानवी मूल्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन पुढे नेले पाहिजे. आमच्या देशाने जगाला अनेक अव्वल शास्त्रज्ञ दिले आहेत, असे ते म्हणाले.
गरज ही शोधाची जननी असते. आता शोधामुळे गरजेच्या सीमांची व्याप्ती आणखी वाढली आहे. संशोधकांना दीर्घ मुदतीच्या फायद्यांबद्दल विचार करण्याची विनंती पंतप्रधानांनी केली आणि आंतरराष्ट्रीय नियम व मानके लक्षात ठेवण्यासही सांगितले.