इस्लामपूर – मला राज्यात प्रचारास वेळ द्यावा लागल्याने आपल्याकडे प्रचारास येता आले नाही. मात्र आपण माझ्या प्रचाराची सर्व जबाबदारी अंगावर घेवून जे कष्ट घेतले, त्यामुळे मला सातव्यांदा विजय मिळाला आहे. भविष्यात आपली अधिक चांगली सेवा करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी दिली. आ. पाटील यांनी लवणमाची, बेरडमाची, किल्ले मच्छिंद्रगड, शिरटे, कोळे, नरसिंहपूर गावांचा आभार दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी सभापती सचिन हुलवान, जि. प. सदस्य पै. धनाजी बिरमुळे, माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुनील पोळ, पं. स. सदस्या सौ. विजया पोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, भाजपाचे नेते, मंत्री निवडणुकीपूर्वी 160 च्या वर आमदार निवडून येतील, असे सांगत होते. मात्र त्यांचे 105 आमदार निवडून आले. राज्यातील जनतेने भाजपला नाकारले आहे, हे निकालावरुन स्पष्ट झाले आहे.