बदलत्या वातावरणामुळे पिंपरी-चिंचवडकरांना काळजी घेण्याचे आवाहन
पिंपरी – दिवसभर कडक ऊन आणि रात्री पाऊस असे विचित्र वातावरण सध्या पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, जंतुसंसर्गामुळे उद्भवणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार पसरत आहेत. त्यामुळे, सध्या शहरातील वायसीएम रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही “व्हायरल इन्फेक्शन’ झालेल्या रुग्णांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सप्टेंबरमध्ये एकट्या वायसीएम (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय) रुग्णालयात चार हजार तापाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते, तर ऑक्टोबरमध्ये तब्बल दोन हजारांची वाढ होऊन हा आकडा सहा हजाराजवळ पोहचला.
मागील काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. यावर्षी, संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊन आणि पावसाची रिपरिप, तर रात्री गारवा असे विचित्र वातावरण पहायला मिळाले.
मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा उकाडा आणि पाऊस असे चक्र सुरू झालेले दिसत आहे. ऊनासोबतच दिवसातून दोन ते तीन वेळा तयार होणारे ढगाळ वातावरण आणि त्यामुळे निर्माण होणारा उकाडा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. वायसीएम रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात 4 हजार 168 तापाचे रुग्ण होते. तर ऑक्टोबर महिन्यात यामध्ये मोठ्या प्रमाणात होवून आकडा 6 हजाराच्या जवळ गेला आहे.
त्याचप्रमाणे दिवाळीतील फटाक्यांच्या धुराने घशाचे विकार उद्भवल्याचे दिसून आले आहे. तसेच दिवाळीतील फराळात तेलात आणि तुपात तळलेले पदार्थ अत्याधिक प्रमाणात खाल्ल्याने देखील घसा खवखवणे, दुखणे, सूज येणे असे आजार वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचप्रमाणे दिवाळीतील फटाक्याच्या धूर दम्याच्या रुग्णांना अत्याधिक त्रास होतो.
यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत फटाक्याचे प्रमाण खूप कमी होते, तरीदेखील दम्याच्या रुग्णांना याचा त्रास जाणवला.
आद्रतेमुळे वाढतो जंतूंचा संसर्ग
बदलत्या हवामानाबरोबरच शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचा निर्माण झालेला प्रश्न, ठिक-ठिकाणी करुन ठेवलेले खोदकाम, त्यात साचलेले पाणी यामुळेही नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सध्याही खासगी दवाखान्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे हवेतील आद्रता वाढली असल्याने, व्हायरल इन्फेक्शन पसरवणाऱ्या जंतूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो. या इन्फेक्शनचा सर्वात जास्त त्रास लहान मुलांना, गर्भवती महिलांना व वृध्दांना होत आहे. लहान मुलांमध्ये ताप, उलट्या, सर्दी, खोकला ही व्हायरल तापाची लक्षणे आहेत. त्यामुळे, पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
व्हायरल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जास्त फिरू नये, तसेच प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या किंवा आजारी असणाऱ्या नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर करावा. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठता, वायसीएम रुग्णालय
यंदा फटाक्याचे प्रमाण कमी असले तरी फटाक्याच्या धुरामुळे घशाचा संसर्ग वाढला आहे. लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये घशाच्या तक्रारी दिसून येत आहेत. दिवाळीच्या फराळाच्या पदार्थामध्येही तेल, तुपाचे प्रमाण अधिक असल्यास या तक्रारी असण्याची शक्यता अधिक असते.
– डॉ. सचिन देशमुख, कान-नाक-घसा तज्ञ