शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा टोला
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद संपताना दिसत नाही. भाजपा मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.
पुढील पाच वर्ष राज्याच्या मुख्यमंत्री मीच असेन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. अशातच राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना फडणवीस यांचा उल्लेख शिवसेनेने मावळते मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची, असे अग्रलेखात नमूद करण्यात करण्यात आले आहे.
सामनाच्या अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे….
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर पत्रकारांना सांगितले की,महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार व आपण स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे राज्यातील गुंता सुटेल व एक सरकार मिळेल असे समजायला हरकत नाही. मुख्यमंत्री अमित शहा यांना भेटून सरकार स्थापण्याचे भाष्य करतात म्हणजे नक्कीच त्यांनी जुळवाजुळव केली असेल व बहुमताचा आकडा वस्त्रगाळ करून जमवला असेल. जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात असे काहीसे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दिसले.
दिल्लीच्या गढूळ वातावरणात महाराष्ट्राला प्रकाश दाखवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सरकारसाठी लागणाऱ्या बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील, पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखेच आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मराटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे.
लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळया वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. मराठी जनतेला कमी लेखू नका. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल.