कोल्हापूर/ प्रतिनिधी- राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे संत्रा, सोयाबीन, कापूस, मका, भात, भाजीपाला, ज्वारी, बाजरी, भुईमुग आणि उडीद उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या शेतकर्यांना तातडीने हेक्टरी १.०० लाख रुपयांची मदत घोषित करावे अशी मागणी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांचेकडे मा.खासदार राजू शेटटी, आमदार देवेंद्र भुयार, मा. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.
राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून राज्यातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने केंद्रीय पथक मागवून नुकसानीची पाहणी करून हेक्टरी १ लाख रूपये मदत जाहीर करावी. राज्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून पावसाने हाहाःकार माजवला आहे. मान्सूनच्या पावसाने सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे हजारो कोटी रूपयाचे नुकसान झाले.
शेजारच्या कर्नाटक राज्याला केंद्रीय आपदा निधीतून मदतीची घोषणा झाली महाराष्ट्रात केंद्रीय पथकानेही त्याचवेळी पाहणी केली मात्र अद्यापही मदतीची कोणतीही घोषणा केंद्रसरकारकडून झालेली नाही. गेल्या पंधरा दिवसापासून संपुर्ण राज्यात अवकाळी पावसाने झोडपले असून हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना व इतका संकटात असताना देखील ना केंद्र सरकार अथवा राज्य सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सरकारच्या या भुमिकेबद्दल शेतकर्यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. संतापलेला शेतकरी कायदा हातात घेऊन सरकार विरोधी उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तरी राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून केंद्रीय पथकाकडून पाहणी करून शेतकर्यांना मदत करण्याची मागणी यावेळी केली आहे.