मुंबई: राज्यातील सरकार स्थापनेची प्रक्रिया खोळंबलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागांचा दौरा करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी अकोल्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गेलेले आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करीत आहेत. तेथे ते कन्नड व वैजापूर तालुक्यातील पीक नुकसानाची माहिती घेतील, असे सेनेच्या निवेदनात म्हटले आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी विशेष तरतूद म्हणून राज्य सरकारने शनिवारी 10,000 कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. राज्यातील 325 तालुक्यातल्या 54.22 लाख हेक्टरवरील ज्वारी, धान, कापूस, मका, तूर आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे, असे फडणवीस यांनी शुक्रवारी आढावा बैठकीनंतर सांगितले होते. यावर्षी प्रामुख्याने अरबी समुद्रातील चक्रीवादळांमुळे मान्सूननंतरही राज्यात जोरदार पाऊस होत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बहुतेक पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठीची 10 हजार कोटींची तरतूद फक्त निव्वळ धूळफेक असल्याची टीका कॉंग्रेस पक्षाने यापूर्वीच केली आहे. तर ही मदत अपुरी आहे आणि अवकाळी पावसाने बळी पडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले आहेत.