पिके भुईसपाट : जनजीवन विस्कळीत
सोरतापवाडी- संपूर्ण महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसाने पूर्व हवेलीतील कदमवाकस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे, आळंदी म्हातोबाची, कोरेगाव मूळ, उरुळी काचंन, शिंदवणे, वळती आदी गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. दोन महिने पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके भुईसपाट झाली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसासह मका, कांदे, बाजरीचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली बाजरी मातीमोल झाली आहे. शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागले आहे. दोन दिवसांपूर्वी दिवसभर धुक्याचे वातावरण होते. अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांची काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुरूवातीला पिके पेरणीच्या वेळी पावसाने उशीर केल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. आता काढणीला आलेली पिके पावसात भिजत आहेत. बाजरीही मातीत गेल्याने हक्काचे पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. कांदे पाण्याने खराब होत असल्याने ते टाकून द्यावे लागत आहे. ऊस पिकात पाणी साचल्याने सऱ्या भरलेल्या आहेत. त्यामुळे लागवडीचा ऊस कुजलेल्या स्वरूपात दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तोडणीला आलेली फुले काळी पडून कुजली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या वेळी फुलांचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
परतीच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आधीच खरीप वाया गेला आता रब्बीवरही पावसाचे सावट असल्याने जगायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेली पीके पावसामुळे काही ठिकाणी वाहून गेली तर काही ठिकाणी शेतात साठलेल्या पाण्याने भाजीपाल्याचा चिखल झाला आहे. अती पावसामुळे टोमॅटो, प्लॉवर, कोबी, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, काकडी, दुधी भोपळा आदी तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. रोपांवर बुरशी पडली आहे. कांदा रोपे पिवळी पडली आहेत. यंदा कांदा लागवड घटण्याची चिन्हे आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सावरावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.