सविंदणे: कर्जबाजारीपणा आणि शेतजमीन नापिकिला कंटाळून शिरुर तालुक्यातील साबळेवाडी टाकळी हाजी ता.शिरूर येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु गेल्या वर्षी दुष्काळाची दाहकता मोठी होती. त्यामुळे त्यांचे उसाचे पीक जळून खाक झाले होते. यावर्षी देखील अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले होते. त्यामुळे त्यांना मोठे नैराश्य आले होते.
या नैराशेतूनच त्यांनी शनिवार दि.२ रोजी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना पुणे येथील वायसीएम येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच वैद्यकीयअधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले.
त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला असून या घटनेने या परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.